Publish Date: Fri, 26 Jul 2019 (09:32 IST)
Updated Date: Fri, 26 Jul 2019 (09:35 IST)
मराठा क्रांती ठोक मोर्चानं येणारी विधानसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
"मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभेच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. आम्हाला आरक्षण दिलं गेलं, मात्र आजही मराठा समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे, प्रवेश प्रक्रियांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहेत," असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.
"गेल्या 30 वर्षांपासून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फक्त राजकीय फायद्यासाठीच सर्व पक्ष या समाजाचा वापर करून घेत आहेत. केंद्रात आणि राज्यातले मराठा लोकप्रतिनिधीही मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळेच मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फेच निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे," असं त्यांनी पुढे म्हटलंय.
दरम्यान, 26 जून 2019ला मुंबई उच्च न्यायालयानं मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि नोकरीत 13% टक्के आरक्षण कायम ठेवलं. राज्य सरकारनं विधीमंडळात तसा कायदाही केला आहे.