Publish Date: Thu, 29 Jul 2021 (23:01 IST)
Updated Date: Thu, 29 Jul 2021 (23:03 IST)
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पार पडली आहे. राज्यातील दुकांनाच्या वेळेत बदल होऊ शकतात. तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सूचित केले आहे की, निर्बंध शिथिल करण्याबाबत सर्वांचे अभिप्राय, मत द्यावी. ते अभिप्राय विचारात घेऊन टास्क फोर्सच्या मदतीने अंतिम निर्णय घेतला जाईल. आरोग्य विभागाकडून असे मत मांडण्यात आले आहे की, राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. तसेच दैनंदिन रुग्णवाढीचा दर देखील या ठिकाणी वाढत आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये पूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह कोकणचा भाग, मराठवाड्यातील बीड, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरचा समावेश आहे. हे जिल्हे सोडले, तर उर्वरित जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटर रेट ०.१, ०.३., ०.४ अशा स्वरुपाने आहे. त्या ठिकाणी दररोज ५ ते १० केसेस आढळत आहे. अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करावेत असे आमचे मत आहे.
पुढे टोपे म्हणाले की, राज्यात शनिवार, रविवार दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यात बदल करून शनिवारी दुकाने ३ ते ४ वाजेपर्यंत चालू ठेवता येऊ शकतात. तसेच आठवड्याला (सोमवार ते शुक्रवार) दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती त्यात वाढ करून ९ वाजेपर्यंत सुरू करता येऊ शकतात. रेस्टॉरंट, चित्रपटगृह, सलून, जिम हे ५० टक्के सुरू करता येईल. पण अशा ठिकाणी एसी नको, खेळती हवा असली पाहिजे. तसेच खासगी ऑफिस ५० टक्के सुरू करायला पाहिजे. रेस्टॉरंटमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यास काही हरकत नाही.
webdunia
Publish Date: Thu, 29 Jul 2021 (23:01 IST)
Updated Date: Thu, 29 Jul 2021 (23:03 IST)