Publish Date: Wed, 22 Apr 2020 (08:46 IST)
Updated Date: Wed, 22 Apr 2020 (08:48 IST)
सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांच्या जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था केली आहे. त्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तरीही हे लोक घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पावित्र्यात येतात. ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन परराज्यातील अडकलेल्या या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडे केली आहे.
मजुरांचा विचार केंद्र शासनाने करावा, एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन निश्चित करावी, अशी मागणी आपण प्रधानमंत्री तसेच रेल्वेमंत्रालयाकडे केली असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या संवादात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यसचिव अजोय मेहता, केद्रीय पथकाचे सदस्य,बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.