Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 21 April 2025
webdunia

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय. स्त्री‍शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई यांची आज त्यांच्या जयंती त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दसुमने.... 

दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली, तर ती फुले दांम्पत्याने. बालविवाहाला विरोध करुन ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडलं. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दांम्पत्यांना यश येऊन त्यास 1856 मध्ये मान्यता मिळाली.

शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्‍या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं.

अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. ज्योतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. ज्योतीरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या.

फुले दांम्पत्यांनी त्यानंतर नेटिव्ह फिमेल स्कूल, दि सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन या संस्‍था स्थापन केल्या. पाहाता-पाहाता फुलेंनी पुणे शहर व परिसरात 20 शैक्षणिक संस्थांचं जाळं पसरवलं. इतकेच नव्हे तर, शाळेतील मुलांची गळती थांबविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना 'प्रोत्साहन भत्ता' तसेच 'आवडेल ते शिक्षण' देण्यावर भर दिला. 19व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली.

अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे फुले दांम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा 10 पटीने वाढली. इतकेच नव्हे तर, फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी फुले दांम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रा‍तील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली.

शैक्षणिक क्षेत्रातल्या मौलिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दांम्पत्याचा समारंभपूर्वक सत्कार केला. याप्रसंगी मेजर कँडी यांनी इंग्रज सरकारचे निवेदन वाचून दाखवून या दाम्पत्याचा देऊन गौरव केला. ज्योतीरावांच्या समता, सत्यपरायणता, मानवतावाद या तत्त्वांचा अंगिकार करुन त्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं सारं जीवन व्यतित केलं.

शिक्षणाची महती गातांना सावित्रीबाई म्हणतात,
''शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हरते पहा! विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ सार्‍या धनाहून, तिचा साठा जयापाशी, तो ज्ञानी मानिती जन!!''
मुलींना शिकवा, भेदाभेद हटवा, असं नुसतं सांगून जमायचं नाही !
शिक्षण देऊन शहाणं करायचं, दुसरा काही उपायच नाही!!

''जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी'' या उक्तीस प्रत्यक्ष कृतीत उतरवून फुले दांम्पत्यांनी मुलींच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. 1889 साली जोतीरावांच्या मृत्युनंतर त्यांच्या ‍स्त्रीशिक्षण, स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता या कार्यांना सावित्रीबाईंनी पुढे गती दिली. सावित्रीबाईंनी जोतीरावांना दिलेली साथ अजोड होती. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्या सावलीसारख्या त्यांच्या बरोबर असत. सेवा व करुणेचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला.

हुंड्याशिवाय कमी खर्चात गोरगरीब, दुर्बल घटकांच्या मुलींचा विवाह व्हावा, यासाठी फुले दांम्पत्यांनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरु केली. त्यामुळे असंख्य पददलितांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्न सहजपणे सुटला. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद खुला करुन जातीभेद निर्मुलनाच्या अभियानास अधिक चालना दिली.

बालवयात विवाह झाल्यावर पतीचा एकाएकी मृत्यु झाल्यास, अशा विधवा मुलींचे त्याकाळी केशवपन करण्यात येत असे. या अघोरी प्रथेचा तीव्र निषेध करुन त्याच्या विरोधात प्रखर लढा दिला. या कुप्रथेच्या विरोधात फुले दांम्पत्यांनी नाभिक बांधवांचा संपही घडवून आणला. बालविवाहांना त्यांनी कडाडून विरोध केला, तर विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर, फुले दांम्पत्यांनी एका तरुण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला शिकवून-सवरुन डॉक्टर केले आणि या त्याच डॉ. यशवंतरावांनी 1897 साली महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरली असतांना आईवडिलांचा आदर्श समोर ठेवून सेवाभावीवृत्तीने मोलाची वैद्यकीय सेवा दिली व असंख्य गोरगरिबांचे प्राण वाचविले.

याशिवाय सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृहातील मुलांची वात्सल्यपूर्ण सेवा केली. 1877 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असता, फुले दांम्पत्यांनी गावोगाव फिरुन निधी जमवला आणि धनकवाडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम सुरु करुन सुमारे एक हजार गोरगरीब मुलांची तेथे भोजनव्यवस्था केली. सुप्रसिद्ध लेखिका इंदुमती केतकर म्हणतात, ''अज्ञात आईबापाची निराधार मुलांना पोटच्या मुलासारखं घेऊन त्यांना मोठं करणार्‍या उदार स्त्री या आपणास अनेक वेळा पहावयास मिळतात, परंतु एखाद्या विधवेला अनैतिक संबंधातून झालेलं मूल आपलेच समजून समाजाच्या विरोधाला न जुमानता त्याचं संगोपन करणारी एकच स्त्री ती म्हणजे सावित्रीबाई!

अद्यापही सावित्रीबाई फुले यांचे कार्य पूर्ण झालं नसलं, तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच महाराष्ट्र शासाने मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. मुलींनी शिक्षण घेऊन स्वतचा, कुटुंबाचा व समाजाचा विकास साधावा, म्हणजे हीच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिझेल-पेट्रोलचे घरगुती वितरण सुरू