Publish Date: Thu, 18 Nov 2021 (09:41 IST)
Updated Date: Thu, 18 Nov 2021 (09:46 IST)
आता हळूहळू सावरासावर करावी,
मनास कुठंतरी थांबायची सवय लावावी,
गुंतण नकोच आता कशातही अजिबात,
ह्याच वयात करावी त्याची सुरुवात,
हळहळ पण किंचीत कमीच करावी,
जे सुटलं त्याची काळजी जाणीवपूर्वक टाळावी,
स्वार्थी म्हटलं तरी चालेल, पण आपल्या पुरतं बघावं,
कोणी काही म्हटलं म्हणून उगाच रागावणं थांबवावं,
अलिप्तता थोडी थोडी अंगीकारावी,
दुरूनच दाद द्यायला यायला मात्र हवी,
कुणी अगत्याने विचारलं च काही तर थोडं सांगावं,
त्याच्यावर मात्र आपल्या इच्छेच ओझं नाही द्यावं,
निसर्गाच्या सानिध्यात घालवावे उर्वरीत काळ,
अशीच स्वीकारावी आयुष्याची आलेली संध्याकाळ!