Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सानंद गोष्ट सांगा स्पर्धे'ची अंतिम फेरी संपन्न

'सानंद गोष्ट सांगा स्पर्धे'ची अंतिम फेरी संपन्न
, सोमवार, 17 जून 2024 (13:14 IST)
इंदूर- संस्कृती जपण्याच्या प्रयत्नांतर्गत सानंद ट्रस्टने आयोजित केलेल्या गोष्ट सांगा स्पर्धेची अंतिम फेरी यशस्वीरित्या पार पडली. आमची पिढी आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकत मोठी झाली. गोष्ट... जी आपल्याला कल्पनेच्या दुनियेत घेऊन जायची, गोष्ट... जी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा एक भाग असायची, ती गोष्ट... जिच्याशिवाय आपल्याला झोप येत नव्हती. गोष्ट... जी ऐकून आपण सुसंस्कृत झालो. आज तीच गोष्ट निव्वळ जुनी गोष्ट बनली आहे.
 
जेव्हापासून आपण इंटरनेटशी निगडित झालो, जणू इतर सर्व नातेसंबंध नाहीशे झाले आहेत, तेव्हापासून सर्वात मोठे आजोबा हे 'गुगल' झाले आहेत, ते कोणत्याही एका मुलाचे आजोबा नाहीत, तर जगातील सर्व मुलांचे आजोबा झाले आहेत ज्यांना सर्व माहिती आहे आणि संपूर्ण जग एक कुटुंब बनले आहे. पण या 'मोठ्या कुटुंबात' काहीतरी हरवलंय... ती म्हणजे आपुलकीची भावना... आता जणू सगळंच यंत्र झालंय, या मोठ्या कुटुंबात सुख-सुविधा निश्चितच आहेत, काही नसेल तर फक्त एकमेकांसाठी वेळ.
 
असो ते काळाचे चाक आहे आणि फिरणार. मात्र शहरातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था 'सानंद न्यास' या संस्थेला ही उणीव जाणवली आणि आजी- आजोबा यांच्यासाठी 'सानंद गोष्ट सांगा स्पर्धा' सुरू केली गेली.
 
कथा शैलीचे पुनरागमन त्याचे महत्त्व निश्चितपणे दर्शवते. सानंद ट्रस्टचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास कुटुंबळे व मानद सचिव श्री. जयंत भिसे म्हणाले की, आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा गेली अनेक वर्षे अविरतपणे सुरू आहे. या वर्षीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 15 स्पर्धकांनी त्यांच्या मनोरंजक, संदेश देणाऱ्या आणि आनंददायक गोष्टी कथन केल्या.
 
गेले चार महिने स्थानिक पातळीवर कुणाच्या गच्चीवर, कुणाच्या मंदिरात, कुणाच्या घरात तर सभागृहात झालेल्या स्पर्धेचा हा अंतिम टप्पा होता. सहभागी शेकडो आजी-आजोबांच्या डोळ्यातील अश्रूंसोबतच पुढच्या वर्षी ही स्पर्धा पुन्हा नव्या उमेदीने आणि उत्साहाने आयोजित केली जाईल या आशेने त्यांचे मन भरून आले. पुढील वर्षी 100 ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी घेत असल्याचा दावा अनेक संयोजकांनी केला. सानंद यांच्या या प्रयत्नाला पाहुण्यांनी तसेच उपस्थित सर्वांनी भरभरून दाद दिली.
 
जेव्हा या कार्यक्रमाला आजी आजोबा तसेच पालकांकडून (ज्यांना आजी आजोबांच्या कथा ऐकून त्यांचे बालपण आठवले) असे कौतुक मिळाले तेव्हा सानंदला स्पर्धेच्या आयोजनामागच्या उद्देशाचे महत्त्व जाणवू लागले.
 
कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे समाजसेवक सरदार श्री नरेंद्रजी फणसे यांच्या शुभहस्ते झाले. पाहुण्यांचे स्वागत श्रीनिवास कुटूंबळे, जयंत भिसे आणि कु. पुर्वी केळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक सौ. रेणुका पिंगळे यांनी केले तर आभार जयंत भिसे यांनी मानले.
 
स्पर्धेच्या शेवटच्या फेरीचे परीक्षक श्री. महेश धुमाळदार, सौ. मोहिनी केमकर आणि सौ. विद्या किबे हे होते.
 
स्पर्धेत सहभागी झालेल्या उपांत्य फेरीतील 15 विजेत्यांना सौ. मधुलिका साकोरीकर, श्री आनंद दाणेकर, सौ. हेमांगी मांजरेकर, श्री विनोद क्षीरे, सौ. सुनेत्रा आंबर्डेकर, श्रीमती संगीता गोखले, सौ. अनुया चासकर, सौ.   प्रतिभा कुरेकर, सौ. शोभना चैतन्य, सौ. आशा कोरडे, सौ. प्राजक्ता मुद्रिस, सौ. पूजा मधुकर, सौ. अपर्णा देव, सौ. दीपाली दाते, श्री शिशिर खर्डनवीस यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
webdunia
सानंद गोष्ट सांगा या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीतील विजेत्यांची नावे-
प्रथम सौ. सुनेत्रा अंबर्डेकर, द्वितीय श्री आनंद दाणेकर आणि तृतीय सौ. प्राजक्ता मुद्रिस असे आहे. स्पर्धेमध्ये अंतिम फेरीतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्पर्धकांना वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे सोन्याची नथ आणि पेंडेंट आणि अनुरूप विवाह मंडळ, शाखा इंदूर आणि राधिका बुटीकच्या सुश्री छाया येवतीकर यांनी प्रायोजित केलेली साडी प्रदान करण्यात आली. प्रसिद्ध रंगकर्मी श्री अच्युत पोतदार द्वारे प्रायोजित पुरस्कार आणि प्रमाणपत्रे जाहीर करण्यात आली.
 
यावेळी सानंद गोष्ट सांगा स्पर्धेत मदत करणाऱ्या सर्व प्राथमिक व अंतिम फेरीचे परीक्षक, समन्वयक व मार्गदर्शक यांचाही गौरव करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरीच बनवा आवळ्याचे तेल, केस होतील घनदाट, लांब