Publish Date: Wed, 09 Jan 2019 (08:55 IST)
Updated Date: Wed, 09 Jan 2019 (08:56 IST)
शीत वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र या वातावरणातील प्रमुख बदलामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील गारठा कायम असून, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १६.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.