Publish Date: Tue, 01 Nov 2022 (08:02 IST)
Updated Date: Tue, 01 Nov 2022 (08:05 IST)
माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिलं. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी देणं अपेक्षित होतं. त्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवली असती तरी चाललं असतं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसंच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.
दुसरीकडे, आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन करणाऱ्या तरुणांचा उल्लेख शेंबडी पोरं आणि पत्रकारांचा उल्लेख एचएमव्ही असा केला. या विधानाचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे. दोन्ही विधानांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आपला शब्द मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor