Publish Date: Fri, 02 Nov 2018 (08:31 IST)
Updated Date: Fri, 02 Nov 2018 (08:42 IST)
यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने 4 दिवसापासून शेतकऱ्यांच्या हक्का साठी आमरण उपोषण सुरू होते. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यात त्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत पीक कापणीचा सर्वे असल्याचे सांगत याचा अहवाल डिसेंबर महिन्यात येणार. यात वणी, झरी सह उर्वरीत तालुक्यांच्या समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत केला जाईल असे लिखित आश्वासन दिले. त्यानंतर डॉ. महेंद्र लोढा यांनी उपोषण मागे स्थगित करत असल्याचे जाहीर केले. किशोर तिवारी यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन हे उपोषण थांबवलं.
आज उपोषणाचा चोथा दिवस होता. सकाऴी साडे दहा वाजता शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन उपोषणस्थळी पोहोचले. त्यांनी सर्व 60 उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी डॉ. लोढा त्यांच्याशी सर्व मागण्यांवर चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी सर्व मागण्या मान्य करत 30 नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या सर्वेक्षणाची वाट बघण्याची विनंती केली. या सर्वेक्षणानंतर डिसेंबर महिन्यात संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करू असे आश्वासन दिले. सोबतच सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मी स्वत: एक शेतकरी पुत्र म्हणून आमदार बोदकुरवार यांच्यासह तुमच्यासोबत उपोषणास बसेल असे जाहीर केले.
आश्वासनानंतर डॉ. महेंद्र लोढा यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले व जर डिसेंबरपर्यंत वणी, झरीसह जिल्ह्यीतील इतर तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले नाही तर अन्नत्याग सोबतच जलत्यागही करू असा इशारा दिला. त्यानंतर झरी तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध शेतकरी यांना किशोर तिवारी यांनी नारळपाणी देऊन त्यांचं उपोषण सोडवले. त्यानंतर डॉ. महेंद्र लोढा आणि इतर शेतकरी व पदाधिकाऱ्यांचे उपोषण सोडण्यात आले.
उपोषण संपताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सर्व उपोषणकर्त्यांचे हार टाकून अभिनंदन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आला. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीन या रॅलीचा समारोप राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाला.