Publish Date: Tue, 05 Mar 2019 (08:41 IST)
Updated Date: Tue, 05 Mar 2019 (08:42 IST)
कोकणातील नाणार प्रकल्पावरून या विरोधाचे रान उठले होते तो नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. आता नाणारच्या समर्थनार्थ रस्त्यावर आलेल्या प्रमोद जठार यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असे वृत्त आहे. कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली सर्व म्हणणे मांडले आहे. नाणार प्रकल्पा रद्द केल्यामुळे कोकणातील तरुणांचा हातचा रोजगार हिरावला गेल्याचे सांगत मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिपी विमानतळाच्या उदघाटनासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. याचवेळी मुख्यमंत्र्यांना मी भेटून राजीनामा देणार असल्याचे जठार यांनी सांगितले.
कोकणामध्ये मागील ४ वर्षांत मोठी विकासाची कामे सुरू झाली आहेत, पुन्हा न भूतो न भविष्यती अशी कामे देखील सुरू झाली, पण काही जणांनी राजकीय भांडवल केले आणि नाणार प्रकल्प रद्द केला आहे अशी टीका जठार यांनी केली. नाणार प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार उपलब्ध झाला असता त्यामुळे जिल्ह्यमध्ये 80 टक्के रोजगार या निमिताने निर्माण झाला असता पण दुर्दैवाने हा प्रकल्प रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.