Publish Date: Thu, 30 Jun 2022 (14:57 IST)
Updated Date: Thu, 30 Jun 2022 (14:59 IST)
"एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो," असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव यांचे चुलत बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रीया दिली आहे. राज ठाकरे यांनी आज एक ट्विट केले आहे. राज यांनी एक हिंदी म्हण प्रसारीत केली आहे. त्यात म्हटले आहे की, "जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना कर्तृत्व मानने लगता आहे, उस दिन से पतन का प्रवास शुरू होता है."
शिवसेनेचे नेतृत्व करणे ही केवळ पुण्याई आणि नशिब म्हणून उद्धव यांना मिळाले. ते त्यांचे कर्तृत्व नसल्याचे राज यांना म्हणायचे आहे. त्यामुळेच राज यांनी एकप्रकारे उद्धव यांना कडक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. अर्थात राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये उद्धव यांचे कुठेही नाव घेतलेले नाही.
राज यांच्याकडून अतिशय आक्रमकपणे प्रतिक्रीया येणे अपेक्षितच होते. उद्धव यांच्याशी पटत नसल्यानेच राज हे शिवसेनेतून बाहेर पडले होते. राज यांना उद्धव यांचे नेतृत्व मान्य नव्हते. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज यांंनी उद्धव यांच्यासह सरकारला चांगलेच लक्ष्य केले. भोंग्यांचा विषयही त्यांनीच उचलला होता.