Publish Date: Tue, 16 Nov 2021 (21:10 IST)
Updated Date: Tue, 16 Nov 2021 (21:40 IST)
विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु आहे. यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. राज्य सरकारने संप मागे घेण्याचं आवाहन केलं असलं तरी कर्मचारी माघार घेण्यास तयार नाहीत. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीबरोबर एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा सुटायला तयार नाही. विलिनीकरणासाठी नेमलेली समिती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका एस कर्मचारी संघटनांनी या बैठकीत घेतली, त्यामुळे संपाचा तिढा सुटण्याऐवजी उलट वाढला आहे.
राज्यातील एसटी कर्माचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन एसटीचं राज्य शासनात विलीनीकरणं करणं ही एकमेव मागणी आहे. जोपर्यंत मागणी मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मी संपकरी कर्मचाऱ्यांना हेच सांगतोय, आपला जो प्रश्न आहे तो चर्चेच्या माध्यमातून मांडला पाहिजे, विलीनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे. त्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे.