Publish Date: Fri, 30 Jul 2021 (20:34 IST)
Updated Date: Fri, 30 Jul 2021 (20:36 IST)
वर्धा जिल्ह्यात चिस्तूर या गावाजवळ अमरावतीहून नागपूरकडे जात असलेल्या एका कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नदीच्या दरीत कार कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चालकसह प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
तळेगांव श्यामजीपंतच्या चिस्तुर गावाजवळ एका 3214 क्रमांकाची कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघे जागीच ठार झाले, तर एक जण आश्चर्यकारक वाचला आहे. मृतांमध्ये अमित गोयते (32) रा. बडनेरा, शुभम गारोडे (25, रा. अमरावरती), आशिष माटे रा. राजुरा जि. अमरावती, हे तिघे जागीच ठार झाले आहेत. शुभम भोयर हा या अपघातातून सुखरूप बचावला आहे, या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे, तर एकाचा मृतदेह झाडावर अडकला होता. दुसरा वाहनात अडकला होता, तिसरा मृतदेह बाजूला पडून होता. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगण्यात आले आहे. कारण मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.