Publish Date: Wed, 25 Mar 2020 (13:34 IST)
Updated Date: Wed, 25 Mar 2020 (13:38 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्याच्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत करोनाला हरवण्याचा संकल्प करा असं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. कारण करोना व्हायरस हा लपलेला शत्रू असून कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही.
या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. या वातावरणात एक सकारात्मक बाब म्हणेज कुटुंब सोबत असल्याचे ते म्हणाले. म्हणून ही वेळ कुटुंबीयांना देत त्यांची आणि स्वत:ची काळजी घ्या असे ठाकरे म्हणाले.
घरांमधले एसी बंद करण्यासंबंधीचे निर्देश केंद्राकडून आले असून राज्यात हे निर्देश कधीच लागू केले गेले आहेत. तरी एकदा पुन्हा मुख्यमंत्र्यांनी घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल, असे म्हटले आहे.
तसेच सरकारच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत असून गरजूंची काळजी घेणे सरकारचं काम आहे तरी उत्पादन बंद ठेवणार्या कंपन्यांनी कर्मचार्यांचे वेतन कापू नये अशी विनंतीही केली आहे.
आज सणाच्या दिवशी महाराष्ट्र शांत असला तरी कोरोनाविरुद्ध लढाई आपण जिंकणार असून विजयाची गुढी उभारु अशा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.