Publish Date: Sat, 25 May 2019 (11:05 IST)
Updated Date: Sat, 25 May 2019 (11:10 IST)
मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असं मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
"मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं, ही मागणी मला तळागाळातून येत आहे. यासाठी भाजप-शिवसेना सरकारने जर एका महिन्यात यावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहे. मला औरंगाबाद लोकसभेत दोन लाख 83 हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत," असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवत खैरेंना थेट आव्हान दिलं. 'ट्रॅक्टर' ही निशाणी घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी 2 लाख 83 हजारांपेक्षा जास्त मतं घेतली. चंद्रकांत खैरेंना याचाच फटका बसला आणि त्यांचा पराभव झाला, असं सांगितलं जात आहे.