Publish Date: Thu, 18 Apr 2019 (11:42 IST)
Updated Date: Thu, 18 Apr 2019 (11:52 IST)
आज मतदानाचा दुसरा टप्पा आहे. महाराष्ट्रात 10 जागांवर आज मतदान होत आहे. अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, प्रीतम मुंडे या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
11 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं.
आज बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या ठिकाणी मतदान होत आहे.
सुशील कुमार शिंदे हे सकाळीच मतदान केंद्रावर हजर झाले. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघी उपस्थित होत्या.
महाराष्ट्रासह देशात 97 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. बुधवारी आसाम (5), बिहार (5), छत्तीसगढ (3), जम्मू काश्मीर (2), कर्नाटक (14), मणिपूर (1), ओडिशा (5), पुद्दुचेरी (1), त्रिपुरा (1), उत्तर प्रदेश (8), पश्चिम बंगाल(3) यांच्यासह तामिळनाडूतील सर्वच्या सर्व 39 जागांसाठी मतदान होत आहे.
सोलापूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान केलं. त्यादरम्यान त्यांना स्वाध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आहे याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, "ते हिंदूत्व वाढवण्याच्या प्रयत्न करत आहेत. पण हा देश कधी एका धर्माचा, एका जातीचा नाहीये. इथं सर्वधर्म समभाव आहे. आपली राज्यघटना ही पूर्णपणे सर्वधर्मावर आधारित आहे,"