कलेचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या या उत्सवात बॉलिवूडकर मागे नाहीत. गणपतीचे अनेक सेलिब्रेटीजच्या घरी आगमन झाले आहे. यंदाच्या गणेश उत्सवात एक अनोखी प्रथा सुरू करण्याचे आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केले आहे. जेव्हा आपण एखाद्याच्या घरी दर्शनाला जातो, तेव्हा प्रसाद म्हणून मिठाई घेऊन जातो. त्याच्याऐवजी वही घेऊन जा. नंतर या जमा झालेल्या वह्या जवळच्या सरकारी शाळेत देता येतील, अशी अनोखी कल्पना अक्षय कुमारने सुचवली आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा, आवाजाचे, पाण्याचे प्रदूषण टाळावे असा आग्रह नेहमी धरला जातो. प्रबोधनाच्या मूळ संकल्पनेने प्रेरित असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवात लोकांच्या जाणिवा वाढवण्यासाठी आता सेलिब्रेटीजही पुढाकार घेत आहेत ही जमेची बाब आहे.