Publish Date: Wed, 31 Mar 2021 (23:16 IST)
Updated Date: Wed, 31 Mar 2021 (23:18 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या 'लॉकडाऊन' लागू करण्याची मागणी करणारा एक, तर 'लॉकडाऊन नकोच' असे म्हणणारे दोन गट राज्यात निर्माण झाले आहेत. पण अपरिहार्यता म्हणून आता सरकारला काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकारचा लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा सुरू असते. पण आता करोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादणार आहे, ही पावले उचलावीच लागणार आहेत, त्यामुळे लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी,' असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. संपूर्ण लॉकडाऊन न करता करोनाचा संसर्ग कसा थोपवता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आता कठोर निर्बंधांचा मार्ग अवलंबले जाणार आहे.
राजेश टोपे म्हणाले, 'गर्दी टाळणे हाच आमचा निर्बंध लावण्यामागचा मुख्य हेतू आहे. गर्दी कशी टाळता येईल. गर्दीच्या ठिकाणांवर कसे नियंत्रण ठेवता येईल, याबाबतचं नियोजन केलं जात आहे. हे नियोजन अंतिम झाल्यावर त्याबाबतची माहिती देण्यात येईल.