Publish Date: Wed, 22 Apr 2020 (16:30 IST)
Updated Date: Wed, 22 Apr 2020 (16:34 IST)
मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून तिथे लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याची बाब वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राचं विशेष पथक मुंबईत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दाखल झालं होतं. या पाहणीनंतर पथकानं व्यक्त केलेला अंदाज मुंबईकरांसाठी धक्कादायक असा आहे. येत्या ८ दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत हाच आकडा ६ लाख ५६ हजारांपर्यंत असू शकेल असा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत मुंबईत ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढतेय, त्या गणिताच्या आधारे हा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने वर्तवला आहे. याच पद्धतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी १ ते १५ मे या दरम्यान महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाच्या परिस्थितीत स्पाईक अर्थात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू शकते असा अंदाज वर्तवला होता.
मुळात, या भागांची पाहणी करून त्याबाबत राज्य सरकारला मार्गदर्शन करणं, हाच या आरोग्य पथकाचा हेतू होता. त्यामुळे त्यांचा इशारा गांभीर्याने घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यानुसार जर रुग्णसंख्या खरंच इतकी वाढली, तर त्या प्रमाणात क्वॉरंटाईन आणि आयसोलेशन बेडची संख्या उपलब्ध ठेवण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.