rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना महाराष्ट्र : 'डेल्टा प्लस' व्हेरियंटमुळे राज्यात निर्बंध लागणार नाहीत - राजेश टोपे

Corona Maharashtra: Delta Plus variant will not have restrictions in the state - Rajesh Tope
, शुक्रवार, 25 जून 2021 (16:03 IST)
'डेल्टा प्लस' व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात कोणतेही निर्बंध लागणार नाहीत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "'डेल्टा प्लस' व्हेरियंटचे आजपर्यंत 21 रुग्ण आढळले आहेत. याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेले नाहीत. रुग्णांचा शोध मात्र प्रशासन घेत आहे. संपूर्ण 36 जिल्ह्यात महिन्याला 100 सॅम्पल घेत आहोत, त्याचा बारकाईनं अभ्यास करत आहोत. या 21 रुग्णांपैकी 80 वर्षांचा एक रुग्ण ज्याला सहव्याधी होत्या, त्याचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे. बाकीचे पेशंट स्थिर आहेत, बरेचसे पेशंट बरे होऊन घरीसुद्धा गेलेत.
 
"त्यामुळे घाबरण्यासारखा विषय अजिबात नाहीये. कोणतेही निर्बंध लावण्याचं सध्या काही कारण नाही. सध्या कोव्हिडच्या अनुषांगिक वर्तणूक आपण पाळली, तर अडचणीचा कुठलाही विषय राहणार नाही."
 
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (23 जून) झालेल्या बैठकीत डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यात निर्बंध लावावेत का, याबद्दल चर्चा झाली.
 
तिसऱ्या लाटेबद्दल केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं बोलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप अधिक संसर्ग असणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यातही त्यांनी घाईघाईनं निर्बंध शिथिल करुन नका असं जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं. नव्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारनं अधिक निर्बंधांची तयारी सुरु केली आहे, असंही या सल्ल्याकडे पाहिलं जातं आहे.
 
बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी चिंतेची बाब आणि 'डेल्टा प्लस'चे रुग्ण
दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारनं राज्यभरात निर्बंध शिथिल करणं सुरु केलं. पाच विविध स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली आणि जिथं चिंताजनक रुग्णवाढ आहे ते जिल्हे वगळता अन्य सर्वत्र नेहमीच्या व्यवहारांसाठी मोकळीक दिली. पण त्यानंतरही रुग्णवाढ मर्यादेत राहिली होती.
 
पण निर्बंध हटवल्यामुळे सर्वत्र गर्दी पाहायला मिळते आहे. विशेषत: बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी चिंतेची बाब बनली आहे. अनेक पर्यटन स्थळांवरही गर्दी पहायला मिळाली. गेला आठवडाभर राज्यातली रुग्णसंख्या कमी होतांना पाहायला मिळाली, पण ती बुधवारी पुन्हा दहा हजारांच्या पार गेली.
 
त्याशिवाय म्युटेशन होऊन देशातल्या अन्य भागांमध्ये आढळायला लागलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन 'डेल्टा प्लस' या नव्या रुपाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. तो आकड्यांमध्ये सध्या कमी वाटतो आहे, पण त्याच्या परिणामकारकतेविषयी अद्याप पूर्ण संशोधन झाले नाहीय. महाराष्ट्रात या विषाणूच्या रुपाचे 21 तर देशभरात 40 रुग्ण आहेत हा आतापर्यंतचा अधिकृत आकडा आहे.
 
त्याच्या पार्श्वभूमीवरच निर्बंध अधिक कठोर करण्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी चर्चा झाली. नाव न घेण्याच्य अटीवर एका वरिष्ठ मंत्र्यांनी निर्बंध कडक करण्याबद्दल चर्चा झाल्याचं 'बीबीसी मराठी'ला सांगितलं होतं.
 
घाईघाईनं निर्बंध शिथिल करु नका : मुख्यमंत्री
नुकचेत शिथिल केलेले निर्बंध पुन्हा कठोर करण्याची शक्यता असतांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक संसर्गाचं प्रमाण असणाऱ्या जिल्ह्यांना घाईघाईनं निर्बंध शिथिल करु नका असं सांगितलं आहे.
 
"दुसऱ्या लाटेचं शेपूट अद्याप बाकी आहे. आपण त्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरीही स्थानिक प्रशासनानं प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कोणताही धोका न पत्करता निर्बंधांबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. स्तरांचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील, तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
त्यामुळेच न ओसरलेल्या दुसऱ्या लाटेबद्दल आणि शिथिल निर्बंधांबद्दल राज्य सरकार अद्यापही साशंक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल