Publish Date: Tue, 17 Apr 2018 (08:45 IST)
Updated Date: Tue, 17 Apr 2018 (08:48 IST)
वाढत्या संघशक्तीला दिशा देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ती 17 ते 21 एप्रिलदरम्यान मुळशी तालुक्यातील कोळवण येथे होणार आहे.
संघाचे अखिल भारतीय सह संघकार्यवाह मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 2019 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि ही चिंतन बैठक याचा काहीही संबंध नसल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.
2007 मध्ये धर्मस्थळ येथे चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर 12 वर्षांनी ही बैठक पुणे परिसरात आयोजित केली आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित राहणार आहेतच, याशिवाय क्षेत्र संघचालक, क्षेत्र कार्यवाह, क्षेत्र प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकारिणीतील सदस्य असे एकूण 70-80 जण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वैद्य म्हणाले.
स्वयंसेवक संघात आणि संघाबरोबर येण्याला अनेकजण उत्सूक आहेत. संघाने तयार केलेल्या वेबसाइटवर 2012 मध्ये 13 हजार “रिक्वेस्ट’आल्या होत्या. त्या वाढत जाऊन आज एक लाख 25 हजार झाल्या आहेत. संपर्काच्या माध्यमातूनही खूप मोठी शक्ती संघ कार्यात येऊ पाहात आहेत. त्या सज्जन शक्तीला सामावून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी काय करता येईल, याचेही चिंतन या बैठकीत होईल असे वैद्य म्हणाले.