Publish Date: Sat, 16 May 2020 (08:56 IST)
Updated Date: Fri, 15 May 2020 (20:59 IST)
द्वापर युगात ज्यावेळी श्रीकृष्ण पृथ्वी वर अवतरले, त्यांना भेटावयास सर्व देवी देवता हे वेष बदलून येऊ लागले. अशात भगवान शंकर कुठे मागे राहणार होते. आपल्या लाडक्या देवाची भेट घेण्यासाठी ते सुद्धा अधीर झाले होते.
पण भेटायला जात असताना कृष्णासाठी काही भेटवस्तू घेऊन जावी असा विचार करून ते जरा थांबले. ते विचार करू लागले ही अशी कोणती वस्तू द्यावी जी कृष्णाला पसंत पडेल आणि तो सतत आपल्याजवळ बाळगू शकेल.
तेव्हा शंकराला आठवतं की त्यांच्याकडे ऋषी दधीचींचे हाड आहे. ऋषी दधीची तेच महान ऋषी ज्यांनी धर्मासाठी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि आपले शरीराचे सर्व हाडं दान दिले होते. त्यांचा हाडांनी विश्वकर्माने तीन धनुष्य पिनाक, गांडीव, शारंग आणि इंद्र देवासाठी वज्राचे निर्माण केले होते.
तेव्हा भगवान शंकरांनी त्या हाडाला घासून त्यांची एक सुंदर आणि मोहक अशी बासरी तयार केली. जेव्हा भगवान शंकर श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गोकुळात गेले तेव्हा त्यांनी ती बासरी श्रीकृष्णाला भेट म्हणून दिली. तेव्हापासून श्रीकृष्ण आपल्याजवळ बासरी ठेवत होते.