Publish Date: Sat, 11 Apr 2020 (06:53 IST)
Updated Date: Sat, 11 Apr 2020 (06:56 IST)
लॉकडाउनच्या काळात लोकांना घरातच थांबवण्यासाठी ‘रामायण’सारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे पुन्हा प्रसारण करणे दूरदर्शनच्या चांगलेच पथ्यावर पडले असून ३ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात दूरदर्शन ही देशातील सर्वाधिक पाहिली गेलेली दूरचित्रवाणी वाहिनी ठरली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे.
दूरदर्शनच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेतील प्रेक्षकसंख्या तब्बल ४० हजार टक्क्यांनी वाढली आहे. यामागे रामायण आणि महाभारत, या मालिकांचेच प्रामुख्याने योगदान आहे, असे ‘बीएआरसी’ने स्पष्ट केले. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात खासगी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तीन आठवड्यांच्या लॉकडाउन दरम्यान रामायणसह महाभारत, शक्तिमान आणि बुनियाद यांसारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे दूरदर्शनने पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. यापैकी बहुतांश मालिकांची निर्मिती दूरदर्शननेच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी असताना केली होती.