Publish Date: Wed, 23 Sep 2020 (16:33 IST)
Updated Date: Wed, 23 Sep 2020 (16:34 IST)
सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाज संघटनांकडून आंदोलन सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषद संपन्न झाली. या परिषदेत मराठा समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असे जवळपास १५ ठराव मंजूर करण्यात आले.
मराठा समाज गोलमेज परिषदेतील ठराव खालीलप्रमाणे -
- मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
- मराठा समाजातील मुलामुलींना चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
- केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
- महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
- सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी.
- राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
- मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.
- मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
- स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.
- अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
- राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
- कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
- राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी.