Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अश्वत्थामा जिवंत आहे काय?

वेबदुनिया
ShrutiWD
असीरगड. रहस्याने वेढलेला किल्ला. महाभारतातला चिरंजीव अश्वत्थामा म्हणे येथे पूजेसाठी येथे येतो. हे खरे की खोटे? या रहस्यावरचा पडदा बाजूला करण्यासाठी थेट तेथे जाण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून हा किल्ला वीस किलोमीटरवर आहे.

किल्ला चढण्यापूर्वी अनेकांकडून त्याच्याविषयीची माहिती गोळा केली. अर्थात प्रत्येकाने सांगितलेली माहिती त्याच्याविषयीचे गूढ वाढविणारीच होती. एकाने सांगितले, त्यांच्या आजोबांनी म्हणे अनेकदा अश्वत्थामाला बघितले होते.

दुसरा म्हणे, एकदा मासे पकडायला तो किल्ल्यावर असणाऱ्या तलावात गेला. पण तिथे त्याला कुणीतरी धक्का दिला. त्या व्यक्तीला कदाचित याचे येणे आवडले नसावे. त्यावरून त्याचा निष्कर्ष की तो अश्वत्थामाच होता. काहींचे म्हणणे होते, की अश्वत्थामाला पाहिल्यावर मानसिक संतुलन बिघडते.
ShrutiWD


या दंतकथा ऐकल्यानंतर अखेरीस किल्ल्याच्या दिशेने मोर्चा वळवला. विजेच्या प्रकाशाने शहरातल्या रात्री झळाळून निघत असताना येथे कोरडाठाक अंधार असतो. संध्याकाळचे सहा वाजले की अंधार किल्ल्यासह परिसराला कवेत घेतो. आणि रहस्य, गूढ या किल्ल्याभोवती दाटायला सुरवात होते.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...

ShrutiWD
किल्ल्यावर चढताना सोबतीला काही गावकरीही होते. सरपंच हारून बेग, गाईड मुकेश गढवाल आणि दोनतीन ग्रामस्थही बरोबर होते. घड्याळाचा काटा सहावर पोहोचला तेव्हा आम्ही किल्ल्याच्या बाहेरच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलो होतो. दरवाजा उघडा होता. आम्ही आत शिरलो, पण वनस्पती आणि वेलींनी आमचा रस्ता अडवला. त्यांना दूर करून पुढे पाऊल टाकतो, तोच अनेक कबरी दिसल्या. गाईड मुकेशने तातडीने खुलासा केला, इंग्रज सैनिकांच्या या कबरी आहेत.

तेथून पुढे गेल्यानंतर एक तलाव दिसला. हाच तो तलाव. येथेच अंघोळ करून अश्वत्थामा शिव मंदिरात पूजेसाठी जातो. मुकेशने सांगितले. पण काहींच्या म्हणण्यानुसार अश्वत्थामा उतालवी नदीत अंघोळ करून येथे येतो, ही माहितीही त्याने पुरवली. पावसाळ्याचे पाणी साचून हा तलाव भरतो. आश्चर्य म्हणजे उन्हाळ्यातही तो आटत नाही. पण तलावातले पाणी हिरवेगार होते.
ShrutiWD


पुढे जाताच लोखंडाचे दोन तुकडे दिसले. मुकेशने सांगितले, येथे फाशी दिली जायची. त्यासाठी हे उभे करण्यात आले आहेत. येथे फाशी दिल्यानंतर मृतदेह येथेच लटकवून ठेवला जायचा. मग त्याचा सापळा खाली पडायचा. ऐकूनच थरकाप उडाला.

पुढे गेल्यानंतर गुप्तेश्वर महादेव मंदिर दिसले. मंदिराभोवती दरी आहे. या दरीतूनच म्हणे गुप्त रस्ता आहे. हा रस्ता खांडव वनातून (खांडवा जिल्हा) येथपर्यंत येतो. याच मार्गे अश्वत्थामा मंदिरात येतो, अशी आख्यायिका आहे. या मंदिराच्या वर्तुळाकार धोकादायक होत्या. चारही बाजूला दरी आणि मध्ये मंदिर. थोडीशी चूक दरीत पडायला कारणीभूत ठरली असती.
ShrutiWD

हे मंदिर सुनसान असले तरी मानवी (?) अस्तित्वाचे पुरावे जागोजागी दिसत होते. नारळाचे तुकडे दिसले. शिवलिंगावर गुलाल होता. शेवटी तिथे राहण्याचे मी ठरविले. तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. या निर्णयाने बाकीचे लोक धास्तावले. गाईड मुकेश खाली चलण्याची विनंती करू लागला. शेवटी दबाव आणून त्याला थांबण्यास भाग पाडले.

काळोख दाटलेला. रात्र चढत चाललेली. अशा परिस्थिती वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडलेला. घड्याळाचे काटे दोनवर पोहोचले आणि तापमान अचानक कमी झाले. बऱ्हाणपूर भागात म्हणे असे अचानक तापमान घटते. पण मला मी वाचलेली माहिती आठवली.

ShrutiWD
अतृप्त आत्म्यांचे वास्तव्य असलेल्या भागात म्हणे तापमान अगदी कमी असते. आम्ही थांबलेल्या भागात तर असे काही नव्हते? ही माहिती सांगितल्यावर बरोबर असलेले पार घाबरून गेले. थंडी आणि भिती यांना दूर पळविण्यासाठी आम्ही शेकोटी पेटवली.

वातावरण भितीदायक बनले होते. झाडावरचे कीटक, रात्रीचे पक्षी ऐकवणार नाहीत असे चित्रविचित्र आवाज काढत होते. हवेचा आवाज भितीची भावना आणखी वाढवत होता. वेळही मुंगीच्या पावलांनी पुढे जात होती. अखेर पूर्वेला लालिमा दिसू लागला. आता चार वाजले होते. सरपंच बेग यांनी सल्ला दिला, आता तलावाच्या जवळ जाऊया. बघू तिथे कोणी आल्याचे दिसते का?

तलावाजवळ गेल्यानंतर तेथे काहीही दिसले नाही. सकाळ अवतरत होती. आम्ही मंदिराच्या दिशेने गेलो. पण काहीच दिसले नाही. पण मंदिरात गेल्यानंतर पाहतो तो काय शिवलिंगावर गुलाबाची फुले दिसली. आम्ही आश्चर्यचकित झालो. हे कसे झाले कळेना. कुणाकडेच याचे उत्तर नव्हते. कुणी तरी भक्त आल्यास त्याने अथवा कुणी साधू ज्याच्याविषयी कुणालाच माहिती नाही, त्यांच्यापैकी कुणीतरी येथे येऊन गेले असावे. त्याच्याशिवाय येथे येणार कोण? पण येथे काहीतरी रहस्य आहे हे नक्की. तेच उलगडण्याची आता गरज आहे.

किल्ल्याविषयी काही...

या किल्ल्याविषयीचा इतिहास जाणून घेण्यासाठी बऱ्हाणपूर येथील प्रा. डॉ. मोहम्मद शफी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, की येथील इतिहास महाभारताशी संबंधित आहे. येथे पूर्वी खांडववन होते. या किल्ल्याचे नाव येथील गुराखी असा अहिरच्या नावावरून ठेवण्यात आले होते.

याला किल्ल्याचे स्वरूप मात्र इसवी सन 1380 मध्ये फारूखी वंशाच्या बादशहाने दिले होते. अश्वत्थाम्याच्या दंतकथेविषयी बोलताना, ही कथा आपणही लहानपणापासून ऐकलेली असल्याचे प्रा.शफी यांनी सांगितले. मात्र, याबाबतीत असलेल्या अनेक दंतकथांची रहस्यमय बाजू शोधण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

The importance of Tulsi तुळशीचे महत्त्व!

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

Show comments