नवी दिल्ली- क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणार्या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी बीसीसीआयने यावर्षी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे, तर ‘अर्जुन पुरस्कारा’साठी भारतीय संघाचा नवा आधारस्तंभ ठरलेल्या अजिंक्य राहाणेचे नाव सुचविण्यात आले आहे.
टी-20 विश्वचषकात अफलातून कामगिरीसाठी विराट कोहलीला ‘खेलरत्न’ने सन्मानित करावे, असे बीसीसीआयला वाटते. या स्पर्धेत 136.50 च्या सरासरीने विराटने 273 धावा फटकावल्या होत्या. तीन झंझावाती अर्धशतके झळकावून तो प्रतिष्ठेच्या सामन्यांमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने व्हावा, अशी शिफारस बीसीसीआयने केली आहे.