Publish Date: Sat, 09 May 2020 (15:09 IST)
Updated Date: Sat, 09 May 2020 (15:13 IST)
फळांचा राजा आंबा याची वर्षभर वाट पाहणारे आंबा प्रेमींनी उन्हाळ्यात असं वाटतं की अगदी पोटभरून आंबे खावे. आंब्यात पोषकतत्त्व आढळत असले तरी अती प्रमाणात याचे सेवन नुकसानदायक ठरू शकतं. तर जाणून घ्या याचे गंभीर परिणाम काय असू शकतात ते-
जुलाब (अतिसार): अती प्रमाणात आंब्याचे सेवन केल्याने पचन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊन अतिसाराचा त्रास उद्भवू शकतो. आंब्याच्या रसात तूप टाकून खाल्ल्याने आंबा बाधत नाही असे देखील सांगण्यात येतं.
मधुमेह: आंब्यात शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींनी आंबे खाणे टाळावे. यामुळे रक्तातील शर्करा वाढण्याची भीती असते.
लठ्ठपणा: आंब्याचे अती सेवन केल्याने पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जाण्यास अडथळे निर्माण होऊन वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्वचासंबंधी समस्या: आंबा उष्ण गुणाचे फळ असून अती सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढते. याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. अनेकदा चेहऱ्यावर मुरूम किंवा ओठांच्या जवळपासची त्वचा कोरडी पडते.
पोटदुखी: अती प्रमाणात आंबे खाल्ल्याने पचन प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे पोटासंबंधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.