Publish Date: Fri, 03 Jan 2020 (17:54 IST)
Updated Date: Fri, 03 Jan 2020 (17:59 IST)
डोकेदुखी, सांधेदुखीप्रमाणेच पाठदुखीचे दुखणे माणसाला जडल्यास जीव नकोसा होतो. आयटीसारख्या उद्योगांमध्ये ज्या लोकांना सतत बसून काम करावे लागते, त्यांना हा त्रास वरचेवर जाणवतो. डॉक्टर वा तज्ज्ञांशी संपर्क साधून तपासणी केल्यावर ही पाठदुखी हाडांशी वा सांध्यांशी संबंधित नसल्याचे कळते आणि कंबरेच्या स्नायूंवर दोष येतो.
वास्तविक पाठदुखीची स्थिती व्यायामाच्या अभावानेच निर्माण होते. तासन्तास बैठे काम करणे, शरीराच्या कमी हालचाली होणे, बसण्याची सदोष पद्धत, वजन उचलताना चुकीच्या पद्धतीने उचलणे, प्रवास करताना (विशेषतः खराब रस्त्यांवर) गाडीवर चुकीच्या पद्धतीने बसणे अशा अनेक कारणांमुळे पाठदुखी जडते. पाठदुखीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण त्यातूनच भविष्यात कदाचित पाठीचे कायमचे दुखणे जडू शकते. तज्ज्ञांच्या मते पाठदुखी सुरू झाल्यास त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. विशेषतः व्यायामानेच पाठदुखीवर मात करता येईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाठदुखी टाळण्यासाठी व्यायाम करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पाठदुखी सुरू झाल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊनव्यायाम सुरू करावेत. कशाप्रकारचे आणि कोणत्या मर्यादेपर्यंत आणि आपल्याला कोणते सोयीस्कर ठरतील असे व्यायाम डॉक्टरांच्या प्रसंगी पात्र जीम इन्स्ट्रक्टरच्या सल्ल्यानेच ठरवावेत. सर्वसामान्यपणे पाठदुखी असलेल्यांनी काही व्यायाम टाळणेही गरजेचे आहे. अशा व्यायाम प्रकारांमध्ये सिटअप्स, पाय पसरवून करण्याचे व्यायाम,
टो-टचेस, लांब अंतरावर जॉगिंग करणे आदींचा समावेश आहे. मात्र सर्वच व्यायाम प्रकार टाळणे हा पाठदुखीवरचा रामबाण उपाय ठरत नाही असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. शरीर सदृढ करणे आणि हृदयाची रक्ताभिसरण व्यवस्था बळकट करणे हा पाठदुखीवरचा रामबाण व सक्षम उपाय आहे. कंबर व हृदयाशी संबंधित व्यायाम केल्याने पाठ दुखणे कमी होऊ शकते. त्याच प्रमाणे चालणे आणि पोहणे यासारख्या एअरोबिक पद्धतीच्या व्यायामांनीही पाठदुखी नियंत्रणात आणता येते.