Publish Date: Thu, 16 Dec 2021 (21:09 IST)
Updated Date: Thu, 16 Dec 2021 (21:10 IST)
मुंबई महानगरपालिकेने विविध कारणांसाठी निलंबित केलेल्या तब्बल 117 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतलं आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचं कारण यासाठी मुंबई महापालिकेने पुढे केलं आहे.
लाचखोरी प्रकरणात तसंच गैरकारभार, बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत या सर्वांना निलंबित करण्यात आलं होतं. पण कोवीड ड्युटीच्या नावाखाली मे 2020 मध्ये या सर्वांना कामावर परत घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कमला मील आग दुर्घटना प्रकारणाती 2 दोषी निलंबित अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.
यात आरोग्य विभागातून 17 तर तीन वेगवेगळ्या रुग्णालयातील 6 जणांना परत कामावर घेतलं गेलं आहे. घनकचरा विभागातून 53, मुख्य अभियंता विभागातून 23, पाणी, सुरक्षा आणि अग्निशामक विभागातून प्रत्येकी 6 निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत रुजु करुन घेण्यात आलं आहे.