Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, भीती नको‌, काळजी घ्या : पशुसंवर्धनमंत्र्यांचे आवाहन

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, भीती नको‌, काळजी घ्या : पशुसंवर्धनमंत्र्यांचे आवाहन
मुंबई , सोमवार, 18 जानेवारी 2021 (07:25 IST)
राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको‌, काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी व मासे खाऊ शकतात, अशी माहिती पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या अफवा व अकारण भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा, असे आवाहनही मंत्री केदार यांनी केले.
 
हे करा
पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. पूर्ण शिजवलेले मांस खा. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.
 
हे करू नका
कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका. टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत संपर्क करा
राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री  केदार यांनी नागरीकांना केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा एकदा चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर