Publish Date: Tue, 11 Jan 2022 (15:23 IST)
Updated Date: Tue, 11 Jan 2022 (15:24 IST)
मुंबईतही कोरोनासंबंधीत नियम आता अधिक कडक केले जात आहेत. मात्र इतर राज्यांप्रमाणे मुंबईत घाई घाईने निर्णय घेणार नाही अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईतील झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी पेडणेकर म्हणाल्या की, “लगेच कुठेही निर्णय घेता येणार नाही, कारण इतर राज्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी घाईघाईने निर्णय घेतले. या निर्णयामुळे त्यांना पाच- पाच वेळा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. आपण एकचं निर्णय घेत एकच लॉकडाऊन लावला. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट मोठ्याप्रमाणात येईल असे वाटले होते ती आली सुद्धा मात्र पंधरा दिवसाच्या आत तिलाही रोखता आले, कारण त्यावेळी आपण लॉकडाऊनमध्येचं होतो. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला बऱ्यापैकी रोख लावता आला. तोपर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागला. मात्र लोक यासंदर्भातील नियमावली फॉलो करत आहेत. असंही महापौर म्हणाल्या.
“कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकं कोरोनाच्या सौम्य लक्षणांनी बाधित झाले. तसेच ज्यांनी अजिबात लस घेतली नाहीत ते अति जोखमीचे जास्त लक्षणं असलेले रुग्ण म्हणून रुग्णालयात भरती झालेत. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकरं लसीकरण पूर्ण करा, तसेच दोन डोस घेऊन 35 -36 आठवडे पूर्ण झालेत त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्राशी संपर्क करत आपली तारखी दाखवून कुठल्या पिरियडमध्ये लस घ्यावी याची माहिती घेण्यास हरकत नाही. बुस्टर डोस लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात फ्रंट वर्कर आले आहेत.”असंही पेडणेकर यांनी सांगितले.