Publish Date: Tue, 19 Jun 2018 (15:09 IST)
Updated Date: Tue, 19 Jun 2018 (15:12 IST)
रेल्वेने आरक्षित तिकिटावर प्रवास करत असाल आणि ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण मोफत मिळणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सदरची माहिती दिली आहे.
सध्या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामकाज सुरु आहे. हे काम खासकरुन रविवारच्या दिवशी सुरु आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना उशिर होत आहे. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये असणा-या आरक्षित प्रवाशांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच, विनाआरक्षित तिकिट काढून प्रवास करणा-या नागरिकांंसाठी सुद्धा आम्ही मोफत जेवण देण्याचा विचार करत आहोत, असेही गोयल यांनी सांगितले.
येत्या 15 ऑगस्टला रेल्वेचे नवीन वेळापत्रक आणले जाणार आहे. त्यामध्ये प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवर चालणा-या नियोजित कामकाजामुळे उशीर होणा-या रेल्वेगाड्यांची माहिती दिली जाणार आहे, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.