Publish Date: Tue, 12 Sep 2017 (08:54 IST)
Updated Date: Tue, 12 Sep 2017 (09:01 IST)
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटूंबीयांची दिल्लीतील तब्बल 165 कोटी रूपयांची मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली. लालू आणि त्यांच्या कुटूंबीयांवर बेनामी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून जप्तीच्या कारवाईकडे पाहिले जात आहे.
बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेली मालमत्ता एबी एक्स्पोर्टस् प्रायव्हेट लि.कंपनीच्या मालकीची आहे. लालूंचे कुटूंबीय या मालमत्तेचे लाभार्थी असल्याचा दावा करण्यात आला आहे. बेनामी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून लालूंबरोबरच त्यांच्या पत्नी राबडीदेवी, पुत्र तेजस्वी आणि मिसा भारती, चंदा, रागिनी यादव या कन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. लालू आणि त्यांच्या कुटूंबीयांकडून बेनामी मालमत्ता गोळा केल्याचे आरोप सातत्याने फेटाळले जात आहेत. राजकीय सूडबुद्धीतून संबंधित आरोप केले जात असल्याची भूमिका लालू आणि त्यांच्या कुटूंबीयांनी घेतली आहे.