Publish Date: Tue, 08 Sep 2020 (13:24 IST)
Updated Date: Tue, 08 Sep 2020 (13:27 IST)
देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत.
यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार असल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे.
केंद्र सरकारनं सार्वजनिक कंपन्यांतील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटाच सुरू केल्याचं दिसत आहे. एअर इंडियासह बँकिंग क्षेत्रातील काही बँकांचं खासगीकरण केलं जाणार असतानाच आता आणखी २६ सार्वजनिक कंपन्यांमधील भागीदारी सरकार विकणार आहे. यात एलआयसीतील काही हिस्सा विकणार असल्याचं समजतं. केंद्राच्या या निर्गुंतवणुकीच्या धोरणावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.