Publish Date: Thu, 10 May 2018 (14:51 IST)
Updated Date: Thu, 10 May 2018 (14:54 IST)
रेल्वेने प्रवास नव्हे तर ट्रेनमध्ये चढता-उतरताना एखाद्या प्रवाशाला प्राण गमवावे लागले, तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. प्रवाशाच्या निष्काळजीपणाचं कारण देत रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय तिकीट नसलं तरी एखाद्या प्रवाशाला रेल्वे प्रशासन भरपाई नाकारु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. भरपाईचा दावा सिद्ध करण्यासाठी प्रवासासंदर्भातील अन्य पुरावे सादर करणे गरजेचे असतील.
ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना मिळणाऱ्या भरपाईबाबत देशभरातील विविध हायकोर्टांनी वेगवेगळे निकाल दिले होते. प्रवाशांची हलगर्जी अपघाताला कारणीभूत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून भरपाई मिळू शकत नाही, असं काही निकालांमध्ये म्हटलं होतं. तर काही प्रकरणांमध्ये रेल्वे प्रशासनाला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने बिहारमधील प्रकरणाचा निकाल देताना हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.