Publish Date: Fri, 11 Jan 2019 (08:57 IST)
Updated Date: Fri, 11 Jan 2019 (08:58 IST)
येत्या १५ तारखेपासून देशभरातील रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या फ्लेक्सी फेयर स्कीममध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यासारख्या प्रीमिअम एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीटाचे दर कमी होतील.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर काही एक्स्प्रेस गाड्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली होती. फ्लेक्सी फेयर स्कीममुळे आरक्षित होणाऱ्या तिकीटांची संख्या वाढत जाते त्याप्रमाणे दरही वाढतात. मात्र, ही स्कीम रद्द झाल्याने तिकीटांचे दर स्थिर राहतील. ज्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये महिन्याला ५० टक्के आसने भरतात त्या गाड्यांमधून सहा महिन्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली जाईल. तर ज्या गाड्यांमधील ५० ते ७५ टक्के आसने भरतात त्याठिकाणी ऑफ सिझनमध्ये फ्लेक्सी फेयर स्कीम नसेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.