भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत समाविष्ट नवोदय विद्यालय समितीमध्ये सहायक आयुक्त, प्राचार्य, स्नातकोत्तर शिक्षक, प्रशिक्षित स्नातक शिक्षक तसेच तृतिय भाषा शिक्षकांच्या पदभरती प्रक्रियेकरीता पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून निवासी शाळेतील अनुभवी शिक्षकांस प्राधान्य आहे.
नवोदय विद्यालय समितीची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थांना मोफत आणि उत्तम शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने समितीस निरनिराळ्या सोयीसुविधांसाठी वेळोवेळी दिलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे आज देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातील नवोदय विद्यालय देशाचे आधारस्तंभ उभे करण्यात यशस्वी होत आहेत.
शिक्षक पदभरतीची प्रक्रिया काहिशी किचकट आहे कारण होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची निवड होत असल्यामुळे काठिण्य पातळी उच्च दर्जाची आहे. नवोदय विद्यालयात नोकरी करण्यासाठी बरेचदा दुर्गम भागात जाण्याची जिद्द आणि मानसिक तयारी ठेवावी लागते. मात्र मुलांबरोबर शिक्षकांकरीता सर्व सोयी उपलब्ध असतात. सुसज्ज निवास, उत्तम आणि पौष्टीक जेवण, फलाहार, खेळायला मोठे क्रीडांगण, शिकविण्यासाठी नवनवीन तंत्र, निरामय आरोग्यास पोषक वातावरणाबरोबरच शाळेत एक डिस्पेंसरी आणि प्रशिक्षित रुग्णसेविका या आणि अशा सर्व सुविधांमुळे मन सहज रमून जातं आणि समाजसेवेचं आत्मिक समाधानही लाभतं.