Publish Date: Thu, 10 Feb 2022 (15:30 IST)
Updated Date: Thu, 10 Feb 2022 (15:32 IST)
पुण्यातल्या हिंजवडी भागात गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद झाला आहे. शरद मोहोळच्या टोळीने विठ्ठल शेलारच्या साथीदारांवर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसात शरद मोहोळसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्याच्या म्हाळुंगे परिसरातील राधा हॉटेल येथे घडली असून दगडफेकीमध्ये विठ्ठल शेलारचे साथीदार गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेप्रकरणी शरद हिरामण मोहोळ, आलोक शिवाजी भालेराव, मल्हारी मसुगडे आणि सिद्धेश्वर बाहु हगवणे अशी आरोपींची नावे आहेत. यांच्यासह इतर ५-६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायिक वादातून विठ्ठल शेलार याने आरोपी सिद्धेश्वर हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. म्हणून, शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून सिद्धेश्वर, मल्हारी, आलोक, यांनी विठ्ठल शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपींनी विठ्ठल शेलार समजून गाडीमधून पळून जाणाऱ्यांना साथीदारांवर दगडफेक आणि कुंड्या फेकून मारल्या. यात ते गंभीर जखमी झाले आहेत, असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. तसेच राधा हॉटेल येथून जाणाऱ्या लोकांची पर्वा न करता सार्वजनिक रस्त्यावर देखील शरद मोहोळच्या टोळीने दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.