Publish Date: Thu, 29 Nov 2018 (11:19 IST)
Updated Date: Thu, 29 Nov 2018 (11:23 IST)
गोसीखुर्द आणि जिगाव सिंचन घोटाळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. खुद्द पवार यांनी मात्र संपूर्ण प्रकरणावर संयमी प्रतिक्रिया दिली आहे. ' न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.
सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याबाबत वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना पवार यांनी न्यायालयाकडे बोट दाखवले. 'सिंचन घोटाळ्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी आता त्यावर काही बोलू शकत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.
या प्रकरणाच्या चौकशीला आतापर्यंत पूर्ण सहकार्य केले आहे. पुढेही करत राहीन. विरोधकांकडून जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत आहेत,' असे पवार म्हणाले.