Publish Date: Thu, 31 Mar 2022 (11:31 IST)
Updated Date: Thu, 31 Mar 2022 (11:33 IST)
राज्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा तडाखा बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
ही घटना अमळनेर तालुक्यातील मांडळात घडली असून जितेंद्र संजय माळी (वय 33) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात काम करत असताना उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉक्टरांप्रमाणे माळी यांचा मृत्यू उष्माघातासारख्या लक्षणांमुळे झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमका खुलासा होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात २७ ते ३१ मार्च दरम्यान उष्णतेची लाट येणाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. वाढत्या तापमानामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे.