Publish Date: Fri, 12 Nov 2021 (17:19 IST)
Updated Date: Fri, 12 Nov 2021 (17:22 IST)
हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव याठिकाणी एका गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री आठच्या सुमारास लागलेल्या या आगीत दहा जनावरांचा बांधलेल्या ठिकाणीच होरपळून मृत्यू झाला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे बांधलेल्या जनावरांना स्वत:ची सुटका देखील करता आली नाही.
या आगीच्या घटनेत संबंधित शेतकऱ्याचं तब्बल दहा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुद्दाम जनावरांच्या गोठ्याला आग लावली असल्याचा संशय पीडित व्यक्तीने व्यक्त केला आहे. सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. गोठ्यातील चित्र पाहून पोलीसही हैराण झाले आहे. अशा विचित्र घटनेत लाखो रुपये किमतीची जिवंत जनावरं जळून मेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.