Publish Date: Fri, 16 Sep 2022 (10:46 IST)
Updated Date: Fri, 16 Sep 2022 (10:47 IST)
राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरु असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरु आहे.
रात्रीपासून मुंबई, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु असून पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातही पावसाने हजरी लावली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान 3 दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहणार –
पुढचे 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.