Publish Date: Sun, 08 May 2022 (11:02 IST)
Updated Date: Sun, 08 May 2022 (11:04 IST)
"माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनीही जबाबदारीने बोलावे असा सज्जड दम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोलावे, इतर कुणीही शहाणपणा करु नये", असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे.
"जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे", असा दमही राज ठाकरेंनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुण्यात 17 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती.
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.