Publish Date: Thu, 15 Sep 2022 (09:09 IST)
Updated Date: Thu, 15 Sep 2022 (09:11 IST)
पालघर येथे हिंदू साधुंना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना जत तालुक्यातील मोरबगी लवंगा या ठिकाणी घडली आहे. मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर आता या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या शिंदे-भाजप सरकारवर यावरून निशाणा साधला आहे. हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
साधूंच्या हिंदुत्वासाठी सरकार सोडले आणि साधूच या राज्यात सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल आहे. तसेच साधूंना मारहाण करणे हा प्रकार योग्य नसून, अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचे आहे, असे जयंत पाटील यांनी म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.