Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करोना लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

करोना लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर
मुंबई , सोमवार, 12 एप्रिल 2021 (07:50 IST)
करोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम प्रभावित झाली असली तरी लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सतत प्रथम क्रमांकावर आहे. राज्याने त्यात विक्रमी नोंद केली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 1 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
 
करोना प्रतिबंधक लसीकरण अभियानाला 16 जानेवारीपासून देशात प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना तर दुसर्‍या टप्प्यात आघाडीवरील सेवकांना लस देण्यास सुरूवात झाली. 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देणे सुरु झाले. को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक गोंधळ वगळता लसीकरणात आतापर्यंत फारशी अडचण नाही. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने गेले दोन दिवस लसीकरण बंद पडले होते. त्यावरही राज्याने मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 1 कोटी 38 हजार 421 नागरिकांना लस देण्यात आली आहे. या आकडेवारीत आणखक्ष वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. लसीकरणातील विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या यंत्रणेचे कौतुक केले आहे.
 
देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने देशात आजपासून ‘लस महोत्सव’ सुरू झाला आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उत्सवात सहभागी होऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
 
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा हेका कायम
 
महाराष्ट्रासह काही राज्यांत लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. विशेषत: केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कुलगीतुरा रंगला आहे. लसवाटपात राजकारण होत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला गेला. राज्याचे सर्व आरोप केंद्र सरकारने फेटाळले आहेत.
 
महाराष्ट्राला लसीचा सर्वाधिक पुरवठा केल्याचा हेका केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कायम ठेवला आहे. केंद्र सरकारकडून राज्याला लसपुरवठा केला जातो. लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यात नियोजन केले गेले नसेल व लसीचे डोस खराब होत असतील तर ते राज्य सरकारचे अपयश आहे, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हरिद्वार: शाही स्नानासाठी भक्तांची गर्दी, कोविड नियमांचे पालन नाही