Publish Date: Wed, 26 Jul 2023 (12:24 IST)
Updated Date: Wed, 26 Jul 2023 (12:27 IST)
राज्यात अनेक भागांत संततधार सुरू आहे. कोकणात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती कायम असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. तसेच नदी काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
कोकणात पावसाची संततधार सुरू असून पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड नगर परिषद प्रशासन, चिपळूण नगर परिषद प्रशासन आणि महाड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. सावंतवाडीत रस्ते पाण्याखाली, राजापुरात पुराचे पाणी घुसले आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहे, तर काही ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने रस्ते जलमय झाले आहेत.
येत्या 48 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामा खात्यानं वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केले आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.