Publish Date: Tue, 11 Dec 2018 (08:10 IST)
Updated Date: Tue, 11 Dec 2018 (08:11 IST)
नाशिकमधील निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांने लिलावासाठी आणलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने १०६४ रुपयांची मनीऑर्डरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. मात्र, आज नैताळे येथील पोस्ट कार्यालयात ही मनीऑर्डर परत आली. या मनी ऑर्डरवर पंतप्रधानांकडून वा कार्यालयाकडून स्वीकारण्याबाबत कुठलीही पोहोच पावती मिळून आली नाही. यामुळे साठे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
संजय साठे या शेतकऱ्याने शेतातील कांदा निफाड बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. क्विंटलमागे या शेतकऱ्याला १५१ रुपये भाव मिळाला. त्यामुळे रागाच्या भरात मिळालेल्या पैशाची पंतप्रधानांना मनीआर्डर करत निषेध नोंदविला.कांदा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला अवघे १ हजार ६४ रुपयांची पावती मिळाली. कांद्याला आलेल्या खर्चापेक्षा खूपच कमी पैसे मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने मिळालेली रक्कम निफाड पोस्ट ऑफिसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केली होती.