Publish Date: Thu, 22 Sep 2022 (22:11 IST)
Updated Date: Thu, 22 Sep 2022 (22:12 IST)
लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत कोसळला आहे. यामुळे टँकमधून एलपीजी गॅसची गळती सुरु असून सावधानता म्हणून आज रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
एलपीजी टँकरची गळती तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली आहे. उरण आणि गोव्यावरून दोन टीम अपघात स्थळी पोहोचणार आहेत. दुपारी तीन वाजता हा अपघात झाला आहे. पुलाचा कठडा तोडून टँकर पाण्यात कोसळला आहे. या टँकरमध्ये २८००० किलो एवढा प्रचंड एलपीजी गॅस भरलेला आहे.
हा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. मुंबई गोवा महामार्गावरील या भागातून जाणार टप्पा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग आंजणारी पुलाच्या अलीकडून पालीमध्ये बाहेर पडणारा आहे.