Publish Date: Fri, 31 Dec 2021 (15:20 IST)
Updated Date: Fri, 31 Dec 2021 (15:21 IST)
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही.
राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकार तसेच प्रशासनाने दिलाय. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. याच कारणामुळे वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले. तसेच लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.