Publish Date: Tue, 10 May 2022 (21:13 IST)
Updated Date: Tue, 10 May 2022 (21:16 IST)
भोंग्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिशय खरमरीत पत्र लिहीले आहे. विशेष म्हणजे, भोंग्यावरुन दुसऱ्यांदा राज यांनी उद्धव यांना पत्र लिहीले आहे. गेल्यावेळप्रमाणेच यंदाच्या पत्राची भाषा सुद्धा अतिशय खरमरीत आहे. त्यामुळे त्याची सध्या दोरदार चर्चा होत आहे.
मशिदींवरील भोंगे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार काढण्यात यावे अन्यथा ४ मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावला जाईल, असे खुले आव्हान राज यांनी दिले होते. त्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक पोलिसांनी स्थानिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिस बजावली. काहींची धरपकड केली तर काहींना अटक केली आहे. या सर्व प्रकाराची मोठी चीड राज यांना आलेली दिसते. त्यावरुनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना अतिशय कडक भाषेत पत्र लिहीले आहे. राज्य सरकार भोंग्यांवर कारवाई करायचे सोडून मनसैनिकांवर कारवाई करीत आहे, हे अयोग्य असल्याचे राज यांनी म्हटले आहे. तसेच, राज यांनी या पत्राद्वारे अतिशय गंभीर इशाराही दिला आहे. राज यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!, अशा शब्दात राज यांनी उद्धव यांना सुनावले आहे.